विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर(जन्म : नाशिक, २७ फेब्रुवारी १९१२; मृत्यू : १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक,नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. कुसुमाग्रजांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे. ओळखलत का सर् मला पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन
गंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन
माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली
भिंत खचली चूल वीझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले
कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बान्धतो आहे चिखल गाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरि मोडला नाहि कणा
पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हणा.
_कुसुमाग्रज