काव्यकथा मराठी

समस्यांच्या गाठी - गौतम बुद्धांचे विचार


Listen Later

आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक पातळीवर जगताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही समस्या इतक्या जटील असतात की, त्या सोडवताना, त्यांचे निराकरण करताना जीव अगदी मेटाकुटीला येतो. या समस्या केवळ भौतिक असतात, असे नाही, तर त्या मानसिक पातळीवरही असतात. या समस्यांच्या गाठी सोडवण्यासाठी गौतम बुद्धांनी चपखल मार्ग सांगितला आहे. जाणून घेऊया गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांची रंजक कथा...एकदा भगवान गौतम बुद्ध एका कपड्याचा तुकडा घेऊन आपल्या शिष्यांजवळ आले. कोणाशी काहीही न बोलता आसनस्थ झाले. त्या कपड्याला काही अंतरावर पाच गाठी मारल्या. आता गौतम बुद्ध काय करतील, असा विचार शिष्यगण करू लागले. गाठीनंतरचा कपडा आणि मूळ कपडा एकच आहे, हे कोण सांगू शकेल का, असा प्रश्न बुद्धांनी शिष्यांना केला. याचे उत्तर देणे तसे कठीण आहे. एकीकडे विचार केला, तर कापड तेच आहे. दुसऱ्या दृष्टीने विचार केला, तर गाठींमुळे कपड्याच्या बाह्य रुपात बदल झाला आहे. त्याची मूळ प्रकृती बदललेली नाही, असे उत्तर सारिपुत्र या शिष्याने दिले. सारिपुत्र यांनी दिलेल्या उत्तरानंतर तो कपडा गौतम बुद्धांनी उचलला आणि दोन्ही बाजूंनी तो ओढला. दोन्ही बाजूंनी ओढल्यामुळे या कपड्याच्या गाठी सुटतील, असे वाटते का, अशी विचारणा सारिपुत्रांना केली. यावर, नाही. गाठी अजून घट्ट होतील. त्या सोडवणे आणखी कठीण होईल, असे उत्तर सारिपुत्रांनी दिले. या गाठी सोडवण्यासाठी काय केले पाहिजे, असे बुद्धांनी विचारले. सारिपुत्र म्हणाले की, या गाठी नक्की कशा प्रकारे पडल्या आहेत, ही गोष्ट निरखून पाहावी लागेल. गाठी योग्य पद्धतीने पाहिल्यानंतर त्या कशा सोडवता येतील, यावर प्रकाश टाकला जाऊ शकतो, असे उत्तर सारिपुत्रांनी दिले. सारिपुत्र तुम्ही एकदम सत्यकथन केले. हीच गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. मूळ प्रश्न इथेच आहे. ज्या समस्येत तुम्ही अडकलेले आहात, ज्या समस्येने तुम्हाला ग्रासले आहे, ती सोडवण्यासाठी तिच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. समस्येचे मूळ शोधणे गरजेचे आहे. ही समस्या का निर्माण झाली, याचा मागोवा घेतला गेला पाहिजे. समस्येच्या मुळाशीच आपण गेलो नाही, तर ती आणखी गडद होईल, असे ते म्हणाले. जागतिक पातळीवर हाच प्रकार सुरू आहे. सर्वांना कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासले आहे. त्या वैयक्तिक असोत, सामाजिक असोत वा मानसिक असोत. काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर, ईर्ष्या यांसारख्या वृत्तीतून बाहेर कसे पडायचे, असा प्रश्न मानवाला पडतो. परंतु, या समस्यांचे मूळ काय आहे, या वृत्ती आपल्यात कशा समाविष्ट झाल्या, याचा विचार कोणी करत नाही, असे गौतम बुद्ध यांनी सांगितले.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

काव्यकथा मराठीBy Kavita Deoghare