मृणालचे पत्र ' गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची एक अप्रतिम आणि अजरामर कलाकृती.1914 साली गुरुदेव टागोर लिखित या पत्रातून स्त्रियांच्या तत्कालीन परिस्थिती वर भाष्य केले आहे.
पण आज म्हणजे हे पत्र लिहिल्यानंतर 106 वर्षांनी आणि स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही स्त्रियांची परिस्थिती बदलली आहे का ? अतिशय खेदाने म्हणावेसे वाटते की आजही ही मृणाल आजच्या स्त्रियांच्या परिस्थिती चे प्रतिनिधित्व करते.
असो, काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा हे पत्र वाचनात आले आणि नकळत डोळ्यासमोर उभी राहिली अस्मिता.
उंचीपुरी, सोनचाफ्याच्या वर्णाची,चाफेकळी नाकाची ,लांबसडक आणि विपुल असा केशसंभार .थोडक्यात अस्मिता म्हणजे मूर्तिमंत सौन्दर्य.
देशमुखांच्या खानदानी घराला साजेशी अशी देशमुखांची थोरली सून म्हणजे अस्मिता.
तिचे सासरे सूर्यभानसिंह देशमुख म्हणजे एक बडी राजेशाही आसामी.त्यांची शालीन आणि राजस पत्नी सुलोचनाबाई यांच्या कडक शिस्तीत तयार झालेली रणजितसिंह ची पत्नी अस्मिता.
संस्थाने गेली पण या घरांचे राजेपण मात्र कायम राहिले.आजही या घरातील स्त्रियांना सर्वसामान्य स्त्रियांसारखे चारचौघात मोकळेपणाने फिरणे मान्य नाही.बोलणे ,वागणे अगदी हसणे देखील अदबशीर ,हळुवार आणि नाजूक.
यांचा वाडा हेच यांचे विश्व .त्यापलीकडचे जगच यांना माहीत नाही.मोठ्याने बोलणे सुद्धा जिथे वर्ज्य तिथे या बायकांना कसले आले आहेत छंद ? त्यामुळे की काय या घराचा उंबरा ओलांडून आल्यापासून अस्मिता चे गाणे तिच्या गळ्यातच राहिले.ओठांची चौकट ओलांडून ते कधी बाहेर पडलेच नाही.
अस्मिता ...एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी.कॉलेजच्या एका कार्यक्रमात सूर्यभानसिंह यांनी तिला पाहिले. तिचे सौन्दर्य पाहून त्यांनी तिला सून म्हणून मागणी घातली.
तिच्या मध्यमवर्गीय कुटुंबाला ही बरोबरी पेलणार नव्हतीच .म्हणूनच तर सूर्यभानसिंह यांनी फक्त नारळ आणि मुलगी मागितली होती.सुलोचनाबाईंना खरंतर तोलामोलाची सोयरीक हवी होती.पण सूर्यभानसिंह यांचा शब्द अखेरचा असल्याने आता कोणी काहीही बोलू शकत नव्हते.
अस्मिता नवी सून म्हणून वाड्यात आली आणि तिच्या आयुष्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली.एकतर मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळे या सगळ्या चालीरीती तिला पूर्णपणे नव्या होत्या.अतिशय शिस्तीचे आणि मर्यादांचे पालन करावे लागत असल्याने तिच्यातील स्वच्छंदीपणा कुठेतरी हरवत होता.त्यामुळे एक प्रकारचे दडपण आल्यामुळे ती जरा कोमेजली होती.
तिच्या आईने तिची ही घालमेल ओळखली .पण एक खानदानी सून म्हणून तिच्या जबाबदऱ्यांची तिला जाणीव करून देत ,तिच्या नशीबवान असल्याची तिला खात्री पटवून देत तिची समजूत काढली.
पुन्हा सासरी गेल्यानंतर मात्र तिने स्वतःला पूर्णपणे देशमुख घराण्याच्या परंपरा आणि मर्यादा याप्रमाणे नव्याने घडवले. एकदा बागेतील फुले काढत असताना ती नकळतपणे 'केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर' म्हणून गुणगुणत होती.खरंतर तिला सुरांची देणगी होती.आणि गायन तिचा जीव की प्राण होता.
"हे गाणं बजावणं कुलीन स्त्रियांना शोभा देत नाही ", या सासूबाईंच्या शब्दांनी ती भानावर आली. त्यानंतर मात्र पुन्हा कधीही या गळ्यातून सूर उमटले नाहीत.
त्यानंतर काही दिवसांतच देशमुख वाड्यात धाकट्या सूनबाईंचे राजलक्ष्मी चे आगमन झाले. वाईच्या एका सरदारांची लेक होती ती.त्यामुळे इकडे सासरी देखील तिचा रुबाब काही वेगळाच होता.
अस्मिता सर्वसामान्य कुटुंबातील आहे,हे राजलक्ष्मी ला ठाऊक होते.त्यामुळे ती अस्मिताला फारशी किंमत देत नव्हती.त्यामुळे अस्मिता मात्र सतत सर्वांच्या सेवेशी हजर राहून आपली प्रतिष्ठा जपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.
पण स्वतःच्या स्वाभिमानाला जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या अस्मिताला एका वेगळ्या परिस्थिती ला सामोरे जावे लागणार होते.
एका नैसर्गिक आपत्तीत तिने तिच्या आई वडिलांना गमावले होते.तिची एक 15 -16 वर्षांची छोटी बहीण होती.तिला एकटं सोडणं अस्मिताला शक्य नव्हतं.म्हणून ती तिला घेऊन सासरी आली.
खरं तर एवढ्या मोठ्या वाड्यात त्या छोटीची म्हणजेच अमृता ची तशी काही अडचण होणार नव्हती.पण फक्त घरच नाही तर मनही मोठं असावं लागतं.सूर्यभानसिंह गेल्यानंतर वाड्यातील परिस्थिती बदलली होती.
सुलोचनाबाई आणि राजलक्ष्मी यांना स्वतःच्या तालेवार माहेरचा फारच अभिमान होता.त्यात रणजितसिंह देखील घरातल्या गोष्टींमध्ये फारसे लक्ष घालत नसतं. त्यामुळे अस्मिता सतत दडपणाखाली असायची.
त्यात अमृताचे येणे त्या दोघींनाही आवडले नव्हते.त्यामुळे त्या सतत या दोघींचा पाणउतारा करत असायच्या.त्यामुळे अस्मिता फारच दडपणाखाली होती.अमृताचा अपमान ,तिला दिली जाणारी वागणूक याचा तिला त्रास होत होता.पण ती हतबल होती.त्यात तिच्या मुलाकडे वीरप्